‘शोला जो भडके दिल मेरा धडके...’ या गाण्यावरील आपल्या अफलातून पदन्यासाबरोबर साऱ्या थिएटरला नाचवणारे तितकेच अफलातून अभिनेता मास्टर भगवान ऊर्फ भगवानदादा यांचा आज (चार फेब्रुवारी) स्मृतिदिन.
रंकाचा राव व पुन्हा रावाचा रंक अशी भगवानदादांची चित्तवेधक जीवन कहाणी. मुंबईच्या गिरणगावात लहानाचे मोठे झालेले भगवान पालव सिनेमाचे वेड व त्यातील यश यामुळे मास्टर भगवान बनले. ते इतके मोठे झाले, की त्यांनी चेंबूरला आरके स्टुडिओच्या शेजारीच स्वत:चा सिनेस्टुडिओ उभारला. जुहूला समुद्रासमोर बंगला बांधला व सात दिवसांसाठी सात ऐषारामी गाड्या घेतल्या; पण पुढे हे सर्व वैभव जात जात दादा पुन्हा गिरणगावातील त्याच चाळीत आले व तिथेच वयाच्या ८९व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
... मात्र उमेदीच्या काळात दादांनी केवळ सिनेसृष्टीला नव्हे, तर सर्व चित्रपट शौकिनांना आपल्या तालावर अक्षरश: नाचवले. त्यांचा पदन्यास अमिताभ बच्चन यांनीही अंगीकारला.
बराच काळ ‘लो बजेट’ सिनेमांची निर्मिती करणाऱ्या भगवानदादांनी १९५१मध्ये ‘अलबेला’ आणला आणि जणू क्रांती झाली. गीता बालीची साथ व सी. रामचंद्र यांची थिरकती चाल यामुळे ‘अलबेला’ कमालीचा हिट झाला. त्यातले प्रत्येक गाणे आज ७० वर्षांनंतरही तितकेच लोकप्रिय आहे.
बेढब, स्थूल शरीरयष्टी, मोठाले डोळे असूनही दादा लोकप्रयतेच्या शिखरावर पोहोचले, याचे कारण त्यांचा पदन्यास.
पुढे दिवस फिरले, दादांचे सिनेमे आपटले. त्यांना भूमिका मिळेनात, तेव्हा दादा मिळतील ती कामे करू लागले. सुषमा शिरोमणींच्या मराठी सिनेमांतही ते नाचताना दिसले.
एके काळी चाहत्यांच्या गराड्यातच राहणारे दादा लालबागला एकाकी जगू लागले. गीतकार राजेंद्रकृष्ण, सी. रामचंद्र व ओम प्रकाश हेच काय ते त्यांच्याकडे येत राहिले; पण तेही दादांच्या आधीच गेले.
भगवानदादा शरीराने गेले; पण त्यांचे नृत्य मात्र आजही पंचतारांकित हॉटेलांपासून गणपतीच्या मिरवणुका वा लग्नाच्या वरातींत दिसत राहते.
- भारतकुमार राऊत